स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे संस्थापक सदस्य व हिंदुमहासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कृतिशील कार्यकर्ते विक्रमराव सावरकर यांचे रविवार (ता. 23) दुपारी एक वाजता वृद्धापकाळाने वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी स्वामिनी, दोन मुलगे पृथ्वीराज व रणजित आणि स्नुषा असा परिवार आहे. या वृत्तामुळे सावरकरभक्त, देशप्रेमी व हिंदुत्वनिष्ठ नागरिकांमध्ये एकच शोककळा पसरली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे व त्यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव सावरकर यांचे सुपुत्र असलेल्या विक्रमराव यांनी जाज्वल्य देशभक्तीचा व्रत स्वीकारत हिंदुमहासभेसाठी कार्य केले. त्यांच्या हिंदु संघटन कार्यामुळे त्यांचा एक विशेष प्रभाव हिंदुमहासभेच्या कार्यावर राहिला आहे. ऱाष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी देशभर अखंड हिंदुस्थान तसेच समान नागरी कायदा, हिंदूंचे रक्षण आदींसाठी कार्य केले तसेच त्यांचा अनुयायीवर्ग देखील संपूर्ण भारतभर निर्माण केला. सिमला कराराला विरोध करण्यासाठी गनिमी काव्याने त्यांनी सिमल्यात इंदिरा गांधी यांच्याकडे निषेध केला.
मुंबई महानगरपालिकेत वंदे मातरम् हे देशभक्ती गीत म्हणावे, यासाठी मोर्चा काढला तसेच विधानसभेत चर्चा घडवून आणली. त्यावेळी विधानसभेने हिंदुमहासभेच्या कार्यकर्त्यांना शिक्षादेखील सुनावली होती. मात्र आंदोलन यशस्वी झाले. भिवंडी येथे शिवजयंती मिरवणूक निघावी, मलंग गडावरील बंदी दूर व्हावी यासाठी त्यांनी यशस्वी आंदोलनं केली. हिंदुत्वासाठी राजकीय कृतीशील कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखालीदेखील अटक करण्यात आली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या माध्यमातून ठाणे येथे सैनिक शाळा त्यांनी सुरू केली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे ते संस्थापक सदस्य होते. प्रकृती अस्वस्थ असली तरी ते सावरकरांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहिले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्मारकाचे अनेक उपक्रम प्रत्यक्षात साकारले तसेच स्मारकाचे कार्य राष्ट्रीय स्तरावर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

No comments:
Post a Comment