Pages

Showing posts with label yuva sena. Show all posts
Showing posts with label yuva sena. Show all posts

Thursday, 6 March 2014

शिवसेनेत घराणेशाहीची परंपरा अबाधितच!


काँग्रेसवर हयातभर घराणेशाहीचा आरोप करीत राजकारण केलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतही बाहेरचे तर सोडाच; पण पुतण्याऐवजी मुलाला प्राधान्य दिले. 2010 चा दसरा मेळाव्यात तर, मी तुमच्यावर घराणेशाही लादली असेल तर विसरून जा, म्हणत नातवाला युवासेनाप्रमुखपदी बसविले. त्यासाठी विद्यार्थी सेना बासनात गुंडाळली. खरेतर गांधी घराण्याच्या घराणेशाहीला जनमान्यता मिळाली आहे. मात्र, शिवसेनाप्रमुखांनी आपले राजकीय वारसदार ठरविलेल्या उध्दव ठाकरे यांना अजूनही शिवसैनिक व जनतेचे शिक्कामोर्तब लाभलेले नाही. तेच उद्धव आता ’लोकशाही संपवून’ मनमानी तिकीटवाटप करीत सुटले आहेत.
----------------------

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने कल्याणमधूून एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत तर ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी देवू केली आहे. वास्तविक पाहता राजन विचारे हे मागील विधानसभेच्या निवडणुकीत केवळ 2 हजार मतांनी निवडून आले आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघात पाहिजे तसा जनसंपर्कही ठेवलेला नाही. ठोस कामंही केलेली नाहीत. तरीही मातोश्री व पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अंतर्गत राजकारणात त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. ज्या माणसाला विधानसभा निवडणूक जिंकताना नाकीनऊ येतात, त्यांना एकदम लोकसभेची लॉटरी कशी लागली, हे एक प्रश्‍नचिन्हच आहे. या मतदारसंघात आमदार प्रताप सरनाईक व इतरही उमेदवार होते. असे असताना विद्यमान पालकमंत्री गणेश नाईक यांच्याबरोबर सरनाईक व इतर तत्कालीन संभाव्य उमेदवारांचे संबंध असल्यामुळे तुल्यबळ उमेदवार न देता ही उमेदवारी विचारे यांना दिली यामुळे मातोश्रीवरूनच राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांच्या उमेदवारीवर जणू विजयाची मोहोरच उमटवली असल्याचे सिद्ध होते.

काँग्रेसमधील घराणेशाहीवर वारंवार टीका करणार्‍या शिवसेनेने ही परंपरा स्वतःच्या पक्षातही सुरु केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अशी घराणेशाहीची परंपरा असलेल्या या पक्षाने ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मुलाला तिकीट दिले आहे व घराणेशाहीची परंपरा जिवंत ठेवली आहे. वास्तविक पाहता, त्यांच्या मुलाला या मतदारसंघात कोण काळा कुत्राही विचारत नाही. त्याच्यासाठी हा मतदारसंघ नवखा आहे. कामाचा कुठलाही पुर्वानुभव नाही. तो पक्षाचा सदस्य आहे की नाही, याबाबतही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र केवळ शिंदेंच्या दादागिरीमुळे शिवसेनेतील पदाधिकारी, शिवसैनिक मूग गिळून गप्प आहेत. 

स्वतःच्या मुलाच्या विजयासाठी एकनाथ शिंदे आता धडपड करत आहेत. त्यामुळे सहाजिकच त्यांचे ठाणे मतदारसंघाकडे सपशेल दुर्लक्ष होणार आहे, यामुळे अर्थातच ठाण्याची जागा आपसुकच राष्ट्रवादीच्या पदरात पडणार आहे. वास्तविक पाहता, कल्याण मतदारसंघासाठी कल्याण जिल्हाप्रमुख (ग्रामीण) गोपाळ लांडगे यांचे नाव निश्‍चित करण्यात आले होते. मात्र या निष्ठावंत नेत्याच्या पदरी मातोश्रीने ऐनवेळेला धोंडाच टाकला. वास्तविक पाहता, शिंदे यांची पक्षावरील निष्ठा ही संशयास्पदच होती. अंतर्गत राजकारणाने त्रस्त असणार्‍या व अति महत्त्वाकांक्षा असणार्‍या शिंदे यांनी मध्यंतरी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. इतकेच नव्हे तर याआधीही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व शिंदे यांचे जन्मगाव ‘सातारा’ हे कनेक्शन वापरून त्यांची भेटही घेतली. यामुळे सेनेच्या वर्तुळात याबाबत नाराजीही व्यक्त करण्यात आली. तरीही ऐनवेळेला लांडगेंना डावलून शिंदे यांच्या मुलाची निवड करण्यात आली. 

एकीकडे आनंद परांजपे व गणेश नाईक यांच्या घराणेशाहीवर टीका करत मातोश्रीने अखेर शिंदे यांच्या मुलालाच उमेदवारी दिली आहे. यातूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांचा ढोंगी व मतलबीपणा दिसून येतो. निष्ठावंतांना लाथ मारण्याची परंपरा शिवसेनेने या निवडणुकीच्या उमेदवार प्रक्रियेतही पार पाडली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर अगदी खांद्याला खांदा लावून संघटना वाढवणार्‍या मनोहर जोशींनाही याचा फटका बसला. जोशींना तिकीट देण्याऐवजी दक्षिण-मध्य मुंबईत राहुल शेवाळे यांना उमेदवारी देऊ केली आहे. शेवाळेंचे येथे कुठलेही ठोस काम नाही, मतदारसंघही नवीन आहे. मात्र केवळ जोशी यांना विरोध करण्यासाठी त्यांचे नाव सतत दोन-तीन वर्षांपासून प्रोजेक्ट करण्यात आले आहे. स्टँडिंग कमिटीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या अगदी फालतू कामांनाही शिवसेनेच्या मुखपत्रातून दररोज  त्यांना अर्थपूर्ण प्रसिद्धी देण्यात आली. मात्र शेवाळे यांना जोशी यांची ही नाराजी चांगलीच भोवणार आहे. वास्तविक पाहता, शेवाळे हे मागील अणुशक्तीनगर विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. तरीही त्यांना पुन्हा लोकसभेसाठी उभे करून पंतांचा पत्ता जाणिवपूर्वक कट करण्यात आला. या निवडणुकीत शेवाळे पडणार हे जरी उघड असले तरी त्यांना पुन्हा आगामी विधानसभेचे तिकीट देण्याचे मातोश्रीने आश्‍वासन दिले आहे. अर्थात, यासाठी शेवाळे हे मातोश्री व सेनेतील इतर नेत्यांशी दिलखुलास अर्थपूर्ण संबंध ठेवून आहेत. एकंदरीतच ‘पतीव्रतेच्या पदरात धोंडा व वेश्येला मणिहार’ ही परंपरा शिवसेनेने आताही चालू ठेवली आहे.

शिवसेनेचे तथाकथित युवा नेते आदित्य ठाकरे हे यंदा प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. केवळ घराणेशाहीमुळे प्राधान्य मिळालेल्या या तथाकथित नेत्याला कुठल्याही कामाचा अनुभव नाही की त्यांनी साधी नगरसेवकाची निवडणुकही लढवलेली नाही. अशा अपरिपक्व युवकाच्या हाती शिवसेनेसारख्या बलाढ्य पक्षाची धुरा सोपवून उद्धव ठाकरे स्वतःच्या पायावर धोंडा तर मारतच आहेत शिवाय निष्ठावंत शिवसैनिकांच्या विश्‍वासाला तडा देत आहेत. आदित्य हे फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मिडियातून स्वतःची पद्धतशीरपणे प्रसिद्धी करत आहेत. त्यांच्या मागे कुठलेही कार्यकर्त्यांचे मोहोळ नाही. राजकारणाचा अभ्यास नाही, मात्र केवळ घराणेशाहीमुळे हे पक्षाची धुरा अत्यंत बेजबाबदारपणे हाताळत आहेत. अर्थात येत्या निवडणुकीत जनता याचे उत्तर देईलच. 
जय महाराष्ट्र!