अपेक्षेप्रमाणे निकाल आला. काँग्रेस तोंडावर आपटली. मोदींवर गुजरात दंगलीचं बालंट थोपवून द्यायचं. आणि मुस्लिम मतदारांच्या जीवावर पुन्हा एकदा सत्तेत यायचं. हे काँग्रेसचं साधं सोपं गणित साफ चुकलं. भाजपा-शिवसेनेसारख्या पक्षांना कितीही जातीयवादी म्हणून हिणवलं तरी, हिंदू ही त्यांची व्होट बँक कधीच नव्हती. याउलट स्वत:ला सेक्युलर म्हणून मिरवणार्यांनीच कायम अल्पसंख्यांकांच्या एकगठ्ठा मतांवर डोळा ठेऊनच राजकारण केलं. जाती धर्माचं राजकारण हाच त्यांचा कायम विनिंग पॉईंट ठरला. पण यंदा असं झालं नाही.यंदा राजकारणाचा ध्रुव बदलला. जाती-धर्मापेक्षा विकास महत्त्वाचा ठरला. गुजरातेत झालेल प्रगती आपल्याकडेही व्हावी अशीच सगळ्यांची इच्छा होती. आणि म्हणूनच मोदी नावाची लाट आली. त्या लाटेत भले भले आडवे झाले. ज्यांनी ज्यांनी मोदींना विरोध केला ते सगळेच आपटले. सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरविणार्या काँग्रेसला पाच राज्यांत खातंही खोलता आलं नाही. आणि एकून सरासरी हिशेब करता त्यांची धाव अर्धशतकापर्यंतच सीमित राहिली.
का झालं हे असं? मोदींचा करिष्मा की आणखी काही. मोदींनी गुजरातेत जे करून दाखवलं ते कौतुकास्पदच. पण त्याहून जास्त महत्त्वाचं ठरलं ते काँग्रेसचं अपयश. अल्पसंख्याकांच लांगुलचन आणि गरीबाच्या तोंडावर नोट फेकून सत्तेत येता येतं हा माज काँग्रेसला नडला. नुसत्या निवडणुकीच्या तोंडावर सवलती जाहीर करायच्या. भरघोस आश्वासनं द्यायची. आणि पुन्हा सत्तेत येताच स्वत:ची तुंबडी भरत बसायची. हा काँग्रेसी उद्योग त्यांच्याच मुळावर आला. दहा वर्षांपुर्वी झालेल्या गुजरात दंगलीपलिकडे काँग्रेसच्या युवराजांकडे काही मुद्देच नव्हते. आम्ही सत्तेत आल्यास महिलांना सक्षम करू, म्हणताना आत्तापर्यंतच्या सत्तेत महिलांना काय दिलं या प्रश्नाचं उत्तर नव्हते. असंबंद्ध बोलणे किंबहुना बरळणं जनतेवर प्रभाव पाडू शकणार नाही, याची जाण नव्हती. कार्याचा किंवा व्यक्तीमत्त्वाचाही करिष्मा नव्हता. आता सेनापतीपतीच असा असल्यावर सेनेचं जे काही व्हायचं तेच काँग्रेसचं झालं. त्यांच्याबरोबरच त्यांचे मित्रपक्षही धुतले गेले. नरेंद्र मोदी काँग्रेससाठी कर्दनकाळ ठरले.
महाराष्ट्राभरही या मोदी फॅक्टरने बरेच चमत्कार घडवले. इथं भाजपा प्रबळ कधीच नव्हता आणि आजही नाही. मुंडे वगळता संपुर्ण महाराष्ट्रात ज्याचा प्रभाव पडू शकेल असा दुसरा कुणीच इथे आजही नाही. पण तरीदेखिल मोदी हवेत म्हणून भाजपाच्या अनेक उमेदवारांना जनतेने निवडून दिलं. विस्कळीत झालेल्या भाजपाला नवसंजीवनी मिळाली. शिवसेनेशी छुपा दगाफटका करण्याचा प्रयत्न करूनही महाराष्ट्रात भाजपा तरली ती केवळ मोदी फॅक्टरमुळे. याच मोदी फॅक्टरचा लाभ घ्यायचा प्रयत्न मनसेनेही केला, पण तो जाम फसला. राज ठाकरे सपशेल तोंडघशी पडले.
या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात बरीच उलथापालथ झाली. कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त जागा जिंकायच्याच या एकाच ध्यासानं वेडावलेल्या भाजपाने शिवसेनेलाही जेरीस आणलं. एका बाजूनं युती युती म्हणायचं आणि दुसर्या बाजूनं मनसेला चुकचुकारायचं असले उद्योग करून पाहिले. पडद्यामागे सेटलमेंट झाली. आणि मनसेने भाजप सोडून फक्त सेनेचे उमेदवार जिथे उभे आहेत तेथेच निवडणूक लढवली. मनसेचे हे नीच राजकारण महाराष्ट्राच्या जनतेने धुडकावून लावलं. आणि म्हणूनच गेल्या वेळी कित्येक ठिकाणी लाखभर मत खाऊन शिवसेनेला जेरीस आणणारी मनसे यावेळी मात्र सपशेल आपटली. त्याआधीही टोलप्रश्नी सेटलमेंट आंदोलन करून मनसेनं स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतला होता. आणि आता वडा आणि चिकन सूप जाहीर सभेत आणून जनाधार गमावला. काही ठिकाणी डिपॉझिट जप्त झालं. मनसेचं इंजिन वेग घेण्याआधीच रूळांवरून घसरलं.
काँग्रेस राष्ट्रवादीचीही महाराष्ट्रात भलतीच वाट लागली. मनसेच्या ढाली आडून शिवसेनेवर टिका करणारी काँग्रेस मनसेबरोबरच आपटली. काँग्रेसला अशोक चव्हाण वगळता इतर कुणीच महाराष्ट्रात विजय मिळवून देऊ शकले नाही. गुरुदास कामत, मिलिंद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, निलेश नारायण राणे असे मी – मी म्हणणारे एक एक दिग्गज मातीमोल झाले. मुंबई पुन्हा एकदा भगवी झाली. कोकणात पुन्हा भगवा फडकला. ठाण्याचा गडही शिवसेनेने पुन्हा एकदा काबीज केला. कल्याणची सुभेदारी मिळवली. अर्थातच महाराष्ट्रातील प्रमुख अर्थ केंद्रे भगवी झाली. आणि त्याबरोबरच अवघा महाराष्ट्रही भगवा झाला. याचे श्रेय मोदी यांच्याबरोबरच उद्धव ठाकरे यांनाही द्यायला हवे. उद्धव ठाकरे यांचे संघटना कौशल्य, पक्षावरील मजबूत पकड तसेच कार्यकर्त्यांच्या मनात शिवसेनेबद्दल अजूनही कायम असलेली आपुलकी यामुळेही हा लढा जिंकणे सोपे गेले. अनेक ठिकाणी बंडखोरी होऊनही सेनेने घवघवीत यश मिळवले.
काँग्रेस आघाडीला महाराष्ट्रात मोजक्या ५ जागांवर समाधान मानावे लागले. त्यात एक काँग्रेसची आणि ४ राष्ट्रवादीच्या. काँग्रेसच्या इतिहासात ही अशी नामुष्की पहिल्यांदाच ओढवली असावी. आतातरी हे असं का झालं? आपण कुठे कमी पडलो याचा काँग्रेसने विचार केला नाही, तर भविष्यातली परिस्थिती याहून वाईट असेल. मोदींच्या घोषणेप्रमाणे काँग्रेसमुक्त भारताची ती नांदी असेल.
अर्थात या मिळालेल्या विजयाने भाजपा आणि मित्रपक्षाने हुरळून जाण्याचं कारण नाही. आत्ताशा नरेंद्र मोदी हे काँग्रेसचे कर्दकाळ म्हणून पुढे आले आहेत. पण सद्यस्थितीत देशासमोर असलेल्या समस्या आणि भ्रष्टाचारात आकंठ बुडलेली नोकरशाही यातून मार्ग काढत देशवासीयांच्या अपेक्षा पुर्ण करणं खुद्द मोदींनाही तेवढं सोपं जाणार नाही. त्यातच भाजपा अंतर्गत दुफळीलाही त्यांना तोंड द्यावे लागणार नाही. अधूनमधून अपशकून करणार्या ज्येष्ठांना सांभाळत सरकार चालवणं म्हणजे नेमकी काय कसरत आहे, याची मोदींना चांगलीच कल्पना असेल.
त्यामुळे जनतेनेही आता धीर धरायला हवा. मोदी पंतप्रधान झाले म्हणजे लगेच चमत्कार होतील अशी अपेक्षा बाळगण्यात काहीच हशील नाही. मात्र इतर देशांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र बदलेल हे निश्चित. सद्यस्थितीत भारताला खंबीर तारणहाराची गरज आहे. नरेंद्र मोदी ही जबाबदारी पार पाडतील का, याचं उत्तर आता भारताला हवंय.






