Pages

Thursday, 10 December 2015

‘मैत्रेय’कडून गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा चुना; अब्जावधींची प्रॉपर्टी होणार जप्त?

  • चिटफंडप्रकरणी वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांना अटक होण्याची शक्यता
  • हजारो गुंतवणूकदारांकडून गोळा केली कोट्यवधींची काळी माया
  • ‘मैत्रेय’चे दस्तावेज तपासून सेबीने काढला निष्कर्ष

मुंबई : हजारो गुंतवणूकदारांना भूखंड देण्याच्या गोंडस नावाखाली त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या कोट्यवधी रुपयांची काळी माया जमा करण्याच्या निष्कर्षावरून सेबीने मैत्रेयच्या सर्वेसर्वा वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांना सार्वजनिकरित्या लोकांकडून ठेवी गोळा करण्यात प्रतिबंध घातला आहे. कोट्यवधींच्या चिटफंड घोटाळयातील सेबीने दोषी ठरवलेल्या सत्पाळकर यांना फौजदारी खटला दाखल करून कोणत्याही क्षणी अटक होवू शकते.

राज्यात असणार्‍या बोगस चिटफंड कंपन्यांच्या मालकांच्या मुसक्या लवकरच आवळल्या जाणार आहेत. अशा तब्बल 62 बोगस चिटफंड कंपन्याची यादी सरकारने बनवली आहे. यापैकी साईप्रसाद प्रॉपर्टी लिमिटेडचे प्रमुख बाळासाहेब भोपकर यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्यांच्या 15 बँकांतील 192 अकाऊंट खातीही सील करण्यात आली आहेत. हीच वेळ आता मैत्रेय प्लॉर्ट्स अँड स्ट्रक्चर्स प्रा. लि. चे वर्षा सत्पाळकर व जनार्दन परूळेकर यांच्यावर येणार आहे.

सेबीने दोषी ठरवलेल्या सत्पाळकर यांची मालमत्ता जप्त होवू शकते, त्यांच्या कंपनीची नोंदणी रद्द होवू शकते व वेळ पडल्यास त्यांना अटकही होवू शकते.
सन 1999 साली मधुसुदन सत्पाळकर यांनी नेटवर्क मार्कटिंगच्या माध्यमातून मैत्रेय कंपनी स्थापन केली. मात्र दुदैवाने मैत्रेयची स्थापना होऊन केवळ पाच वर्षे उलटली असताना त्यांचे निधन झाले. त्यांनतर त्यांच्या पत्नी वर्षा सत्पाळकर यांनी या उद्योगाची धुरा हाती घेतली व 10 वर्षांच्या कालावधीत रिअ‍ॅलिटी, पब्लिकेशन, हॉस्पिटॅलिटी, कम्युनिकेशन, रुरल ग्रोथ व्हेंचर आणि सोशल सर्विसेस अशा विविध क्षेत्रात प्रवेश केला. यासाठी लागणारा हजारो कोटी रुपयांचा पैसा त्यांनी चिटफंडच्या माध्यमातून गोळा केला. त्यासाठी त्यांनी गुंतवणूकदारांना भूखंड देण्याचे खोटे अमिष दाखवले. यासाठी मैत्रेय प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर्स प्रा. लि. ही कंपनी स्थापन करून गोरगरिब गुंतवणूकदारांना चुना लावला.

गुंतवणूकदारांच्या घामातून जमवलेला काळा पैसा त्यांनी चित्रपट, प्रकाशन, रिअ‍ॅल्टी, रिसॉर्ट्स यांसारख्या वेगवेगळ्या बिझनेसमध्ये गुंतवला, अशी माहिती ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दिली आहे. 

सेबीने निर्बंध आणल्यावर सत्पाळकरांनी त्यांच्या चिटफंड कंपनीतील अधिकार्‍यांच्या नावाखाली पुन्हा नव्या नावाने विविध कंपन्या सुरू केल्या व नव्याने ठेवी घेण्यास सुरूवात  केली. या कंपनीतील फायनान्स डिपार्टमेण्टमध्ये काम करणारे विजय तावरे, प्रिटींग विभागात काम करणारे ज्ञानेश्‍वर वैद्य, जमिनींचे व्यवहार बघणारे अजित पाठारे यांच्या नावावर नव्या कंपन्या सत्पाळकरांनी सुरू केल्या असून त्यांच्याद्वारे नवीन लोकांकडून नव्याने ठेवी घेतल्या जात आहेत. या सर्व व्यक्तींची त्वरीत चौकशी करण्याची मागणिही तिरोडकर व सामाजिक कार्यकर्ते दिलीप इनकर यांनी केली आहे.

मैत्रेय ग्रुपतर्फे प्रकाशित होणार्‍या ‘भटकंती’, ‘मैत्रीण’ ही मासिके व मैत्रेय प्रकाशन या संस्थांतही ही काळी माया गुंतवलेली आहे. 26 सप्टें 2014 रोजी त्यांनी ‘टपाल’ हा मराठी चित्रपट काढला होता. याशिवाय बोईसर येथील ‘मामाचा गाव रिसॉर्ट’मध्येही गुंतवणूकदारांच्याच घामाचा पैसा आहे. आजमितीला या चिटफंड कंपनीची 140 हून ऑफिसेस असून तेथून ठेवी गोळा केल्या जात आहेत. या सर्व ऑफिसेसला सील लावण्यात यावे, अशी मागणीही इनकर यांनी केली आहे.

मैत्रेयचे वसई, विरार, जळगाव व सांगली या भागांत अनेक गृहनिर्माण प्रकल्प आहेत. नाशिकला 40 बंगल्यांचा पांडववन प्रकल्प आहे. मुंबईजवळ ससूनवघर येथे 97 शाही बंगल्यांचा प्रकल्प उभारला जातोय. नाशिकमध्ये मैत्रेय ग्रीन प्रकल्प उभा रहात आहे. या सर्व प्रकल्पासाठी उभारला गेलेला पैसा हा सत्पाळकरांनी बेकायदेशीररित्या जमा केला आहे, त्यामुळे या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीजला त्वरीत सील करण्यात यावे, असेही तिरोडकर यांनी सांगितले.
मी 2014 मार्चला सेबीला अर्ज करून विचारले की, मैत्रेय ग्रुपवर काही कारवाई केली का? त्यावर त्यांनी उत्तर दिले की, आम्ही 2 नोटीसा मैत्रेय ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्यांना पाठविल्या आहेत.
खरे तर मैत्रेय ग्रुपने त्यांचा संपूर्ण बिझनेस रेसॉर्ट आणि कन्स्ट्रक्शनमध्ये डायव्हर्ट केला आहे. यामध्ये प्रायव्हेट कंपन्यांचाही समावेश आहे. परंतु या कंपन्या ऑडिटमध्ये येत नाहीत. त्यांचा फंडींगसोर्सही कळत नाही. 
मी सेबीकडे मागणी केली की, मैत्रेय ग्रुपच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्सवर बंदी आणावी. त्यांचे अकाऊंट सील करावे आणि योग्य ती कारवाई करावी. परंतु सेबीने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांना केवळ 2 नोटीसा पाठविल्या. नंतर त्यांना 18 महिन्यांचे एक्सटेंशनही दिले.
मी सेबीविरूध्द अपीलही दिले, परंतु त्यांनी ते नाकारले.या घोटाळ्यामध्ये जनतेचे काय? त्यांचे पैसे बुडणार. आता त्यांनी जनतेकडून पैसा गोळा करणे बंद केले आहे. परंतु अगोदर वसूल केलेल्या पैशांचे काय? यात फक्त ट्रस्टची भलाई आहे. जनतेची मात्र फसवणूक होत आहे.
-मंदार दसुरे, आरटीआय कार्यकर्ते  (नाव बदलले आहे) 
---------------------------------- ---------------------------------- --------
  • चिटफंड प्रकरणातील 420 महेश मोतेवार यांच्याप्रमाणेच सत्पाळकर यांनाही प्रसिद्धी व पुरस्कारांची प्रचंड आवड आहे. यासाठी ते वेगवेगळ्या युक्त्या करीत असतात. वेळ पडल्यास पुरस्कार मॅनेजही करत असतात.
  • या सर्व आरोपांबाबत मैत्रेयच्या मास कम्युनिकेशनच्या हेड जयश्री देसाई यांना विचारले असता त्यांनी हे आरोप जुने असल्याचे सांगितले.
  • ‘मैत्रेय’ला नवीन ठेव योजना सादर न करण्याचे, कंपनीच्या संपत्ती व मालमत्तेच्या विल्हेवाटीस किंवा लोकांकडून मिळवलेल्या पैशाचा अन्यत्र विनियोग करण्यापासूनही मनाई करण्यात आली आहे.
उन्मेष गुजराथी

No comments:

Post a Comment