Pages

Saturday, 3 October 2015

शेतकर्‍यांच्या आशेवर सरकारने फेरले पाणी

एकनाथ खडसे यांनी बनवली महाराष्ट्राची प्रयोगशाळा 
65 प्रयत्नांत पावसाचा प्रयोग अयशस्वी;
विरोधी पक्षनेते मख्ख 

दुष्काळाच्या भीषण परिस्थितीवर अभ्यासपूर्ण पद्धतीने मात करण्याऐवजी कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी कृत्रिम पावसाचा प्रयोग केला. हा प्रयोग सपशेल अयशस्वी झाला ; इतकेच नव्हे तर यासाठी तब्बल 28 कोटी रुपयांचा चुराडा झाला, मात्र यातून सरकारने कोणताही बोध घेतला नाही. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते विखे पाटीलही मूग गिळून गप्प आहे. 
श्री श्री रविशंकर यांच्यापासून ते आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सारे नेते, साधुसंत या दुष्काळग्रस्त भागात येवून गेले, मात्र शेतकर्‍यांच्या आत्महत्या कोणीही थांबवू शकले नाही. या सर्वांचे दौरे म्हणजे दुष्काळी पर्यटनच होऊ लागले आहे.
कृत्रिम पावसासाठी सरकारने आजवर केलेल्या 99 क्लाऊड सिडींगपैकी 65 प्रयत्न सपशेल अयशस्वी झाले आहेत तर उर्वरित 34 प्रयत्नांत पडलेला पाऊस हा नैसर्गिकरित्या पडला आहे की कृत्रिमरित्या याबाबत साशंकता आहे. इतकेच नव्हे तर 5 मिलीमीटरपेक्षा कमी पडणारा पाऊस हा शेतकर्‍यांना कोणत्याही दृष्टिकोनातून फायदेशीर नसतो, हे सिद्ध झालेले आहे. यामुळे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी आणिबाणीच्यावेळी दुष्काळग्रस्त भागाची प्रयोगशाळा बनवून 28 कोटी रुपयांचा चुराडा केल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी शरद पवार सरकारने असा प्रयोग केला होता, तोही अयशस्वी ठरला होता.

पावसाने दगा दिल्यामुळे मराठवाड्यातील परिस्थिती अतिशय भीषण आहे. या आपत्तीत सापडलेल्या दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यावर सरकारने जवळपास 27 कोटींचे कंत्राट परदेशी कंपनीला दिले. मात्र आजवर केलेल्या 99 क्लाऊड सिडींगपैकी 65 प्रयत्न अयशस्वी ठरले. तर मागील चार दिवसांत 19 पैकी 18 क्लाऊड सिडींगचे प्रयत्नही पान 4 वर सपशेल फेल गेल्यामुळे शेतकर्‍यांच्या आशेवर मात्र पाणी फिरले आहे. 

अमेरिकेच्या ‘वेदर मॉडिफिकेशन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या सहाय्याने कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करणार्‍या क्लायमेट कंपनीला हे कंत्राट 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर म्हणजेच 3 महिन्यांकरिता देण्यात आलेले आहे. या कृत्रिम पावसामुळे जनावरांच्या चार्‍याचा तरी प्रश्‍न सुटेल असे शासन सांगते. मात्र, पिकांना त्याचा काहीही उपयोग होणार नसल्यामुळे शेतकर्‍यांची पीक समस्या जैसे थेच राहणार आहे. 

अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांत 15 ते 18 ऑगस्टदरम्यान केल्या गेलेल्या क्लाऊड सिडींगच्या 19 प्रयत्नांत 45 फ्लेअर्सचा वापर करण्यात आला. 4 ते 18 ऑगस्टच्यादरम्यान 99 वेळा क्लाऊड सिडींग केले गेले. त्यासाठी 208 फ्लेअर्सचा वापर केला गेला. यापैकी 4 ते 5 ऑगस्टला पावसाच्या जेमतेम सरी कोसळल्या. मात्र, त्यानंतर लातूर, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, जळगाव जिल्ह्यांतील काही भागांत केलेल्या प्रयोगालाही अपेक्षित यश आले नाही. 

20 ऑगस्टला राज्यात क्लाऊड सिडींगसाठी उपयुक्त ढग उपलब्ध नसल्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला नाही. दिवसा अपेक्षित ढग नसतात. रात्री मात्र ते असल्याचे रडार दाखविते. त्यामुळे आजवर दिवसा केला गेलेला क्लाऊड सिडींगचा प्रयोग रात्री यशस्वी होऊ शकतो का, याची चाचपणी सुरू आहे. एकंदरीतच कोणतेही पूर्वनियोजन, पूर्वअभ्यास न करता कृषिमंत्र्यांनी केवळ प्र्रसिद्धीसाठी राज्याची प्रयोगशाळा बनवल्याचे व त्यातून कोट्यवधी रुपयांचा चुराडा केल्याचा आरोप ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. उदयकुमार पाध्ये यांनी केला आहे.

सिल्व्हर आयोडाइटचे घातक दुष्परिणाम ढगांवर केमिकलचा मारा करण्यासाठी सरकारने खास अर्जेंटिनाहून मागवण्यात आलेले सिल्व्हर आयोडाइट हे केमिकल मनुष्यप्राणी व पर्यावरणासाठीही अत्यंत घातक आहे. याचा वारंवार वापर केल्यास आजूबाजूच्या परिसरातील लोकांना अ‍ॅनेमिया, अशक्तपणा व वजन कमी होणे यासारख्या  मस्या उद्भवू शकतात. इतकेच नव्हे तर पिकांवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. मनुष्य व प्राणी यांची त्वचा व डोळे निळे पडणे यासारखे अत्यंत विघातक आजार होतात.
- डॉ. उदयकुमार पाध्ये,  ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ 
दुष्काळामुळे राज्याचा अक्षरशः स्मशानघाट व्हायला निघाला आहे. मात्र तरीही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यावर मौन बाळगून आहे. विरोधी पक्ष असून नसल्यासारखा आहे. त्यांना विरोधी पक्ष नेता बनवून काँग्रेसने युती सरकारवर थोर उपकारच केले आहेत. त्यामुळेच सरकारचे फावते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर आनंदी आनंद आहे. आपण विरोधी पक्षात आहोत की सत्ता बाकांवर, हे अजूनही राष्ट्रवादीला ठरवता आले नाही. त्यामुळेच दुष्काळाच्या या प्रश्‍नाचे स्वरुप अधिकाधिक गंभीर होत आहे.

उन्मेष गुजराथी

No comments:

Post a Comment